कोकणातील समुद्र किनारपट्टीवरून नष्ट होणाऱ्या मासळीच्या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी सुमारे ५५ कोटी रुपये खर्च करून कृत्रिम भित्तीका समुद्रात टाकण्यात आल्या आहेत. दीड वर्षांपूर्वी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तालयामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात ४४ ठिकाणी भित्तीका टाकल्या आहेत. त्यांचा मासळी संवर्धनाच्यादृष्टीने फायदे होत आहेत का, याचा सव्र्व्हे केंद्र शासनाच्या पथकाकडून मे महिन्यात होणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कृत्रिम भित्तीकांना विरोध झाला होता. त्यामध्ये जाळी अडकून मच्छीमारांचे मोठे नुकसान होईल, असा आक्षेप मच्छीमारांनी घेतला; परंतु या भित्तीका मासळी संवर्धनाच्यादृष्टीने उपयुक्त असल्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली आहे.
मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर नीतेश राणे यांनी सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यापैकी कृत्रिम भित्तीका हा एक उपाय आहे. या भित्तीकांना दीड वर्षे होत आली आहेत. लुप्त होणाऱ्या मासळीच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी सिमेंट, रेती, स्टील आदी साहित्यांनी माशांसाठीची कृत्रिम घरे बनवून ती कोकण किनारपट्टीवर दहा वावाच्या आत सोडण्यात आली. जिल्ह्यात ४४ ठिकाणी या कृत्रिम भित्तीका आहेत. हा प्रकल्प दीड वर्षांनंतर यशस्वी झाला किंवा नाही याचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
पाच वर्षांनंतर दिसतील फायदे – भित्तीका टाकल्यानंतर कमीत कमी चार ते पाच वर्षांत प्रत्यक्षात त्याचे फायदे दिसू लागतील, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले. कृत्रिम भित्तीका पाण्यात टाकल्यानंतर त्यावर माशांना पूरक अशी प्रवाळ निर्माण होण्यासाठी कालावधी लागतो. त्यानंतरच मासळीचे संवर्धन होण्यास सुरुवात होईल, असे संशोधकांचे मत आहे.
४४ ठिकाणी कृत्रिम भित्तीका – समुद्रकिनारी रत्नागिरीत ४, जयगड १०, दाभोळ १२, गुहागर १२ आणि नाटे समुद्रकिनारी ६ ठिकाणी कृत्रिम भित्तीका टाकण्यात आल्या. एका ठिकाणी २०० संच याप्रमाणे कृत्रिम भित्तीका टाकण्यात आल्या आहेत.