समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी दापोली, गुहागर येथे सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी सावनीचा देखील संपर्क तुटला आहे. या कासवाचा आतापर्यंत १९६० किलोमीटरचा प्रवास नोंद करण्यात आला आहे. पाच पैकी तीन कासावांशी संपर्क तुटला असून, तीन कासवं नॉट रिचेबल झाली आहेत. उर्वरित दोन कासवांशी संपर्क असून ती दक्षिणेकडे कर्नाटकच्या किनारीपट्टीवर आढळली आहेत.
कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण अधिकच वाढले आहे. कासवांच्या संवर्धनासाठी वन विभागासह कासवमित्रही पुढे सरसावले आहेत. ही कासवं एका किनाऱ्यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, यावर अजूनपर्यंत खोल अभ्यास झालेला नव्हता. यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमाफत वेळास, आंजर्ले, गुहागर किनाऱ्यांचा पाच कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले.
कोकणातील किनाऱ्यांवर अंडी घातल्यानंतर त्या कासवांचा पुढील प्रवास सुरू झाला आहे. टॅगिंगद्वारे कासव कुठे आणि कसा प्रवास करतात, याची माहिती गोळा केली जात आहे. कासवांचा प्रवास सुरु झाल्यानंतर सर्वात प्रथम गुजरातच्या दिशेने गेलेल्या लक्ष्मी कासवाचा संपर्क तुटला. नंतर २ मार्चला त्याची शेवटची नोंद मिळाली होती. अंडी घातल्यानंतर खोल समुद्राकडे वाटचाल कासव करत असतात.
पावसाळ्यामध्ये किनाऱ्यावर आणि परिसरामध्ये शेवाळ आणि त्यांना पूरक अशा खाद्य पदार्थांची निर्मिती होत असते. त्यामुळे अनेक वेळा कासव किनाऱ्याजवळ असल्याची नोंद होते. वनश्री, रेवा अंडी घातल्या ठिकाणीच रेंगाळत आहेत. त्यानंतर प्रथमा कासवाचा संर्पक तुटला आणि त्यापाठोपाठ ५ जूनला सावनी कासव नॉटरिचेबल झाले आहे.