संपूर्ण देशासाठी काळा दिवस. तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये देशाने आपला पहिला सीडीएस अधिकारी गमावला. या अपघातामध्ये सीडीएस बिपीन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला असून, सोबत त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अजून १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाने या अपघातात फक्त बिपीन रावतच नाही, तर सेनेतील इतर काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही गमावलं आहे. त्यामुळे देशात शोककळा पसरली आहे.
देशात या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बिपीन रावत यांच्या अपघात नंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, तोपर्यंत ते जिवंत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू ओढवला. आणि मग त्यांच्या निधनाची बातमी अधिकृतरित्या देण्यात आली. पंतप्रधान, राष्ट्रपतींसह, सर्व स्तरातून यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजधानी दिल्लीतही आता शोकाकूल वातावरण आहे. सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव तामिळनाडूतून दिल्लीत आणलं जाणार आहे. त्यामुळे कालपासूनच त्यांच्या घरासमोर सुद्धा पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या हेलिकॉप्टर अपघातामुळे देशाने एक प्रचंड धाडसी अधिकारी गमावला. ते ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाले आणि त्याच दिवशी त्यांनी संरक्षणप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.
सीडीएस बिपीन रावत यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सैन्यासाठी आणि देश सेवेसाठी अर्पण केले. त्यांच्या नावावर अनेक धाडसी पराक्रम आहेत. सर्जिकल स्ट्राईक घडवण्याच्या प्लानमध्ये त्यांची अत्यंत महत्वाची मुख्य भूमिका होती. त्याचप्रमाणे देशातील मुख्य घडलेल्या युद्धामध्ये त्यांचे नेतृत्व आणि प्रमुख सहभाग होता. कारगील युद्धातही ते सहभागी झाले होते. त्यांचं देशासाठीचे अनमोल योगदान देश आणि भारतीय सैन्य कधीही विसरू शकत नाहीत. जगभरातून त्यांच्यासाठी शोक संदेश पाठविण्यात येत आहेत. सोशल मिडीयावर सुद्धा केवळ त्यांच्या कर्तुत्वाची चर्चा सुरु आहे.
धाडसी अधिकाऱ्याला आलेल्या अपघाती मृत्युनंतर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला.