डोळ्यातून वाहणारा अश्रूंचा पूर… गळ्याशी उमटणारे कढ… अशा अवस्थेत शुक्रवारी सारी ईशाळवाडी एकत्र आली होती. जमलेल्या गर्दीत कुणाचा भाऊ नव्हता, कुणाची बहीण, आई- बाप.. त्या साऱ्यांना ईशाळवाडीच्या डोंगरानं कोणतीही कल्पना न देता दहा दिवसांपूर्वी गुडूप केलं. त्यानंतर शुक्रवारी उरलेल्या नातेवाईकांनी इर्शाळवाडीच्या डोंगराखाली गाडल्या गेलेल्यांना दहा दिवसांचा पिंड ठेवला, आणि ‘का.. का..’ अशी आर्त हाक घातली. डोंगरकडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडीतील दुर्घटनेत मृत पावलेल्यांचा सामूहिक दशक्रिया आणि उत्तरकार्य विधी शासकीय इतमामात शुक्रवार दि. २८ जुलै रोजी नम्राचीवाडी येथे करण्यात आले. यावेळी मृतांचे नातेवाईक, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नाभिक बांधवांनी पुढाकार घेत विनामूल्य मुंडन केले. इर्शाळवाडी येथे दि. १९ जुलै रोजी रात्री दरड कोसळल्याने अनेक माणसं, ‘चिमुकली ढिगाऱ्याखाली गाडली गेली. निसर्गाच्या सानिध्यात असलेले गाव एका क्षणांत होत्याच नव्हते झाले.
डोंगरही सुन्न झाला – डोळ्यादेखत आपली आई, मुलगा वडील हे दरड खाली गाडले जात असताना, काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने नातेवाईकांच्या हंबरडा आणि किंचाळ्यांनी इर्शाळवाडीचा डोंगरही सुन्न झाला. मदतकार्य सुरु असतांना आपले आई, वडील जिवंत असतील या विचारांतून बचावलेले लोक ढिगाऱ्याकडे एकटक डोळे लावून पाहत होते. अखेर शोधकार्य संपले. मलब्याच्या ढिगाऱ्याखालून २७ मृतदेह बाहेर काढले. अद्यापही ५७ बेपत्ता आहेत. सुदैवाने १४१ बचावलेल्यांमध्ये लहान मुलं, महिला, वृध्दांचा सम वेश आहे.
सामुहिक दशक्रिया विधी – ‘जे गेले त्यांचा सामुहिक दशक्रिया विधी शुक्रवारी विधीपूर्वक शासकीय इतमामात पार पडला. परिसरातील नाभिक समाज बांधवांनी विनामुल्य मुंडन केले. केशकर्तन झाल्यावर दशक्रिया विधी रीतिरिवाजाप्रमाणे करण्यात आला. त्यानंतर समाज मंदिर येथे मृतांच्या तसबीरी ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचे पूजन त्यांच्या नातेवाईक यांनी केल्यावर पुन्हा अश्रूंचा बांध फुटला.