मागील वर्षापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. जी अद्यापपर्यंत बंदच आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंदिरे उघडण्यावरून एक सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे कि, कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे सध्य स्थितीला बंदच राहतील, जर कोरोना संक्रमितांचा आकडा कमी झाला तरच दसरा, दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे पुन्हा उघडली जाऊ शकतात.
कोरोना संक्रमितांची संख्या कमी झाल्याने अनेक जिल्ह्यामध्ये नियम शिथिल केले गेले असून, संपूर्ण बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. परंतु, थिएटर, धार्मिक स्थळे याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सध्या सणांचे दिवस आहेत. दसरा, दिवाळी तोंडावर असून कोरोनाबाधितांचे जर प्रमाण घटले तर मंदिरे उघडण्याबाबत निर्णय घेणे शक्य होणार आहे. संबंधित निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करून घेतला जाईल. आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच याबाबत अधिकार असल्याची स्पष्टोक्ती आरोग्यमंत्री यांनी दिली आहे.
केंद्राला निती आयोगानं संभाव्य तिसऱ्या लाटेचा पत्राद्वारे दिलेला इशारा हा जून महिन्यातील आहे. तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्याची तयारी पूर्ण झाली असून, आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती, ऑक्सिजन, मेडिसिन तसेच लहान मुलांच्या आरोग्य संबंधीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात कोणताही तिसऱ्या लाटेचा इशारा नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा टोपेंनी म्हटले आहे.
कोरोना निर्बंधित लस घेणे हे एक प्रकारचे कवचकुंडल आहे. त्यामुळं सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावं, असं मी आवाहन करतो. कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही कोरोना संक्रमण होणार नाही असं नाही. पण, लस घेऊनही कोरोनाचे नियम पाळले नाही तर कोरोनाची लागण होऊ शकते. राज्य सरकारकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात उपाययोजना सुरू आहेत. जर संक्रमित कमी आढळले तर मंदिरे आणि शाळाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल आहे.