जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्याला पडलेल्या खड्यामुळे, दुरुस्तीची कामे सुरु आहेत. अनेक कामगारांबरोबर त्यांचे संपूर्ण कुटुंब रोजंदारीसाठी म्हणून पडेल ते काम करत असते. अनेकदा या कामगारांची मुले आई-वडील कामात मग्न असताना रस्त्याच्या कडेला खेळताना दिसतात. परंतु या खेळण्याच्या नादामध्ये काही वेळा महामार्गावर सुद्धा येतात आणि काही वेळेला अपघात घडण्याची शक्यता असते. अशीच एक घटना राजापूर मधील एका ठिकाणी घडली आहे. ज्यामध्ये दोन निष्पाप जीवांचा मृत्यू ओढवला आहे.
राजापूर तालुक्यातील बाकाळे येथील सागरी महामार्गाचे काम सुरु आहे. तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या मुलींना टेम्पोने ठोकरल्याने दोघींचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागरी महामार्गावरून जैतापूरमार्गे देवगडकडे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोने वाकेड येथील तीव्र वळणावर तीन ते चार जणांना ठोकरल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका ११ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक पाच वर्षाच्या मुलीला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू ओढवला आहे. नाटे पोलिसांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, या टेम्पोमुळे अन्य दोघांनाही या अपघातात गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली असून टेम्पोने ठोकल्यानंतर टेम्पो चालक तिथेच टेम्पो टाकून फरार झाल्याचे बोलण्यात येत आहे. येथे रस्त्याच्या कामावर आलेल्या मजुरांनापैकी ही मुले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ सागरी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर येथे दाखल करण्यात आले. परंतु दुर्दैवाने या दरम्यान एका ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, दुसरी ५ वर्षाची मुलगी उपचारादरम्यान गतप्राण झाली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला असून टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.