महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरासह तालुक्यातील जनता त्रस्त आहे. पावसाळ्यापूर्वीच दिवसातून अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होणे, लांजा शहरासाठी स्वतंत्र वायरमन नसणे याचप्रमाणे, शहराची लोकसंख्या आणि इतर ग्रामीण भाग यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करणे आदी विविध प्रश्न आहेत. याबाबत ठाकरे शिवसेना पदाधिकारी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. महावितरणच्या या कारभारामुळे जनता त्रस्त आहे. तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनाबरोबरच शासकीय कामांचा खोळंबा होत आहे. नळपाणी योजनांवर खंडित वीजपुरवठ्याचा मोठा परिणाम होत असल्याने लोकांना मोठी अडचण होत आहे. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमांवरही खंडित वीज पुरवठ्यामुळे बाधा येत असल्याची बाब महावितरणच्या अभियंत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
यापूर्वी शहरासाठी कायमस्वरूपी वायरमन नेमला होता. मात्र त्याची अन्य ठिकाणी बदली झाल्यानंतर शहरासाठी स्वतंत्र वायरमन उपलब्ध नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबतचे निवेदन महावितरणला देण्यात आले. तसेच ग्राहकांना भेडसावणाऱ्या महावितरणच्या विविध समस्या संदर्भात महावितरणच्या अभियंत्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. लांजा शहरासाठी बुधवारपासून (ता. १४) स्वतंत्र वायरमन नेमण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीला शिवसेना उपजिल्हा संघटक उल्का विश्वासराव, तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, महिला तालुका संघटक पूर्वा मुळे, शहर सचिव सचिन लिंगायत, उपशहरप्रमुख मोहन तोडकरी, दिलीप मुजावर, माजी शहरप्रमुख नितीन शेट्ये, किरण बेर्डे, संदीप खामकर, मंगेश आंबेकर आदी उपस्थित होते.