मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कळवते ते बहादूरशेख नाकादरम्यानच्या वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या खालील भाग डासळण्याच्या स्थितीत असल्याचा आरोप युवासेना तालुकाप्रमुख (शिंदे गट) निहार कोवळे यांनी केला आहे. त्यांनी आपल्या सहकान्यांसह त्या ठिकाणाची पाहाणी करत या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. संबंधित ठेकेदाराने येथील काम निकृष्ट दर्जाचे केले असून, भविष्यात अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे त्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही कोवळे यांनी केली आहे. चिपळुणातील वाशिष्ठी नदीवरील पूल हा महामार्गावरचा महत्त्वाचा पूल मानला जातो. सुरवातीपासूनच या पुलांची कामे वादाच्या भोव-यात सापडलेली होती.
पावसाळ्यात जुना पूल वाहतुकीला बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावल्यानंतर या पुलांची रखडलेली कामे उजेडात आली. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर दोन वर्षापूर्वी या परिसरातील दोन पुलाची कामे मार्गी लागली. दरम्यानच्या काळात काम सुरू असतानाच एका पुलाचा अप्रोच रोड खचल्याचाही प्रकार घडला होता; मात्र त्यानंतर ठेकेदाराने त्या अप्रोच रोडची डागडुजी केली. ही घटना घडत नाही तोच पुलावरचे काँक्रिटीकरण उखडून आतील लोखंडी सळ्याही बाहेर पडल्या होत्या मात्र आता तर या पुलाच्या खालील भाग ढासळण्याच्या स्थितीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या वाशिष्ठी पुलाखालील ठिकाण काही तरुणांनी मद्यपींचा अड्डाच बनवला आहे. त्याची माहिती घेण्यासाठी युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे यांनी सहकाऱ्यांना सूचना केली होती. त्यानुसार युवासेना उपतालुका अधिकारी आदित्य जोशी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांना पुलाच्या खालील काही भाग ढासळण्याचा अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांनी ती माहिती तत्काळ कोवळे यांनी दिली. त्यानंतर कोवळे यांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली. या प्रकारावर संताप व्यक्त करत जर आठ दिवसात या भागाची डागडुजी केली. नाही तर महामार्ग रोखून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराच दिला आहे.