कोकणातील शेतीचे प्रचंड नुकसान करणाऱ्या माकड, वानरांचा बंदोबस्त करा, अशी मागणी घेऊन शेतकऱ्यांनी दोन वर्षे आंदोलन, मोर्चा, उपोषण ही मोहीम राबवली. यामुळे राज्य शासनाकडून माकड, वानर पकडण्यासाठी पथक पाठवण्यात आले. या पथकाने आज कोतवडे येथे दहा वानरांना पिंजऱ्यात पकडले असून ही मोहीम अशीच चालू राहणार आहे, असे वन विभागातर्फे सांगण्यात आले. कालपासून माकड, वानरे पकडण्यासाठी दोनजणांचे पथक दाखल झाले. त्यांनी वानरांसाठी केळी, शेंगा, आंबे आणले असून त्याचे आमिष दाखवून वानरांना पिंजऱ्यात ते पकडत आहेत. काल या पथकाने गोळप येथे पाहणी केली होती. आज सकाळी जवळपास तास-दोन तासांतच दहा वानरांना पकडले. संध्याकाळी त्यांना गाडीतून ते घेऊन जाणार आहेत. ही मोहीम चालू राहणार आहे.
वानरे पकडण्यासाठी यापूर्वी उपोषण करणारे शेतकरी अविनाश काळे यांनी सांगितले, गेली दोन वर्षे वानर, माकड उपद्रवाबद्दल शेतकऱ्यांच्या साथीने लढा देत आहे. आज शासनाने संभाजीनगर येथील मानद वन्यजीव संरक्षक समाधानगिरी यांना बोलावून वानर, माकड पकडण्याची मोहीम सुरू केली. कोतवडे येथे त्यांनी दहा वानर पिंजऱ्यात पकडले असून मोहीम राबवण्यात येत आहे. वन विभागाकडून जिल्ह्यात वानर, माकडांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांचा शोध घेण्यात आला. २६३ ठिकाणी माकडांचे वास्तव्य आहे. गेले वर्षभर ही मोहीम वाडीवस्तीवर व जंगल भागात जाऊन वन विभागाने राबवली. त्यानुसार जिल्ह्यात ४ हजार वानर, माकडांची नोंद केली आहे. या माकडांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी पथक दाखल झाले आहे.