तालुक्यातील कळवंडे येथील धरण दुरूस्तीवरून गेले दोन महिने गदारोळ सुरू आहे. पावसाळी अधिवेशनातही आमदार भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करीत धरणदुरूस्तीचे वस्त्रहरण केले होते. त्यातच गुरूवारी या धरणाच्या मुख्य भिंतीवर नव्याने केलेले पिचींग देखील खचले. यामुळे धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धरणाची पाहणी करून उपाययोजनांवर हालचाली सुरू केल्या आहेत. कळवंडे धरणास गळती लागल्याच्या पार्श्वभूमीवर ३ महिन्यापुर्वी दुरूस्ती करण्यात आली होती. धरणाच्या मुख्य भितींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ५०० मायक्रॉनच्या प्लॉस्टीकचे आच्छादन टाकून त्यावर ३ मीटरचा भराव केला होता. शिवाय भरावावर दगडी पिचींग देखील केले होते.
दरम्यान पहिल्याच पावसात भराव घसरल्याने धरणाच्या मुख्य भिंतीला धोका असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यानुसार काही दिवसांपुर्वीच भर पावसात पुन्हा भराव करून पिचींगचे काम करण्यात आले होते. मुख्य भिंतीच्या मध्यभागी दरडी पिचींगवर साध्या प्लॅस्टीकचे आच्छादन केले होते. परंतू ते टिकणार नसल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त करीत याविषयी बैठक देखील बोलावली होती. या बैठकीत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या मुख्य भिंतीला कोणताही धोका नाही, असे सांगून वेळ मारून नेली होती. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्यानंतर काही दिवसातच मुख्य भिंतीचा भराव पुन्हा खचला आहे. आमदार जाधव यांनी पावसाळी अधिवेशनात कळवंडे धरण दुरूस्ती आवाज उठवला होता.
मात्र आता पुन्हा भराव खचल्याने लघू पाटबंधारे विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता गणेश सलगर, उपअभियंता विपूल खोत व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी कळवंडे येथील प्रगतशिल शेतकरी वसंत उदेग यांच्यासह परिसरातील शेकडो ग्रामस्थ धरणावर जमले होते.” धरणाची पुन्हा दुरूस्ती करून पावसाळा संपताना पाणी साठा करणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितले. सुमारे १.९० दशलक्ष घनमिटर इतकी पाणी साठवण क्षमता असलेल्या कळवंडे धरणाचा १४० मिटर मधील काही भाग खचल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कळवंडेसह कोंढे, शिरळ, पाचाड, रेहेळभागाडी येथील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.