जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची निवड होईपर्यंत शरद पवार गटाकडून समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. या माध्यमातून पक्षसंघटनेचे कामकाज चालणार आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदार रमेश कदम आणि माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांची नावे चर्चेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार शेखर निकम यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यातील काही ठिकाणी मात्र शरद पवार यांना मानणारा मोठा गट आहे. या सर्वांचा समन्वय मेळावा १२ जुलैला रत्नागिरीत झाला. त्यांचे नेतृत्व चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी केले. या वेळी अनेक तालुकाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निरीक्षक शेखर माने हेही उपस्थित होते. त्या वेळी संघटनात्मकरित्या तत्काळ काही नियुक्या केल्या जातील, असे सुतोवाच करण्यात आले होते. त्याप्रमाणे रत्नागिरीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव हे अजित पवार गटासोबत गेल्याने नवीन जिल्हाध्यक्ष नेमणे अपेक्षित आहे; मात्र तोपर्यंत एक समिती शरद पवार गटाकडून गठित करण्यात आली असून, त्यामध्ये माजी आमदार रमेश कदम यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, राजापूर तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर, गुहागर तालुकाध्यक्ष आरेकर, दापोली तालुकाध्यक्ष नितीन मयेकर, लांजा येथील महमंद राखंगी, मंडणगड येथील प्रकाश शिगवण, खेड येथील अमित कदम यांचा समावेश आहे.
जिल्हाध्यक्ष पदासाठी रमेश कदम आणि कुमार शेट्ये यांची नावे चर्चेत आहेत; परंतु अन्य पक्षाप्रमाणे राष्ट्रवादीत दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी असे दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जात नाही. त्यामुळे रमेश कदम यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीने आपले पक्षीय धोरण बदलून दोन जिल्हाध्यक्ष केले तर मात्र कुमार शेट्ये यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.