समुद्रातील मासेमारी बंद असल्याने सध्या खाडीच्या माशांना मागणी वाढली आहे; पण अपेक्षित मासे नसल्याने दर वधारले आहेत. दोनशे ते तीनशे रुपयांना मिळणारे खेकडे सहाशेवर, तर पावसात मिळणारे काकई, तिसरे, लेपी, सुळे, कांटा, ताऊज यासारखी मासळीही पाचशे ते सहाशे रुपये किलोनी विकली जात आहे. मासे खवय्यांची पंचाईत झाली असून, अनेक जण चिकनकडे वळू लागले आहेत. तिथेही किलोचा दर नेट २८० ते २९० रुपयांवर पोचला आहे. मोसमी पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोकण किनारपट्टीवर जुनच्या पहिल्या पंधरवड्यात कडकडीत उन पडलेले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्रही खवळलेला आहे. १ जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आली. त्यानंतर खाडीमध्ये मासेमारीला सुरवात झाली. पावसाला किनारी भागात येणारे मासेही सापडू लागले आहेत.
या माशांचे प्रमाणे कमी असल्याने खवय्यांची पंचाईत झाली आहे. रत्नागिरी शहराजवळील राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरावर माशांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. हंगामामध्ये ताजे मासे खरेदीसाठी अनेकजणं सकाळी व सायंकाळी तिथे हजेरी लावतात. आज गेलेल्या खवय्यांना माशांचे दर चांगलेच वधारलेल पहायला मिळाले. मासे खरेदी करताना अनेकांच्या खिशाला चाट बसली. मोठा खेकडा ६०० रुपयाला एक या प्रमाणे विकला जात होता. तिसरे किंवा मुळे १५० रुपये शेर होते. ते शंभर रुपयांनी विकले जातात. पावसाळ्यात मिळणारा ताऊज मासा खरेदीसाठी अनेकांची झुंबड उडते. याला २५० ते ३०० रुपये अर्धा किलो दर आहे. किलोला ५०० ते ६०० रुपये आकारले जात आहेत. बोयरं, रेणवी हे मासेही याच दराने विकण्यात येत आहेत. लेपी, सुळे, कांटा, खाडीची कोळंबी यासारखी मासळी विक्रीला ठेवण्यात आली होती. त्याचेही दर वधारलेले आहेत. सध्या कोकणात आकाडीचा सण साजरा होत असल्यामुळे चिकन, मटणाला मोठी मागणी आहे.