पावसाचा जोर ओसरला असून आज सूर्यदर्शनही झाले. या पावसामुळे जिल्ह्यात घरे, गोठ्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भातशेतीचेही नुकसान झाले असून कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. चांदेराई बाजारपेठेतील पाणी ओसरल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. काल रात्रभर पावसाचा धुमाकूळ सुरुच होता; मात्र सकाळपासून पावसाने उसंत घेतली. जिल्ह्यात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ७७ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात पडला आहे. रत्नागिरीत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काजळी नदीचे पाणी कमी झाले.
पाणी ओसल्यानंतर ग्रामस्थांनी दुकान व साहित्यांची साफसफाई करण्यास सुरुवात केली. पुराचे पाणी शिरल्यामुळे बाजरपेठेतील सुमारे ८० दुकानांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे मागील २४ तासात दापोलीत सुमारे सहा घरांचे अंशतः सुमारे ४५ हजाराचे नुकसान झाले. एका शाळेची संरक्षण भिंत कोसळली. खेड तालुक्यातील शिरगाव कोंडवाडी येथील यशवंत भोसले यांचा बैल वाहून गेला. चिपळूणमध्ये जांभुळवाडी येथे खाडीचे खारे पाणी शेतात घुसल्याने नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतले आहे. सं
गमेश्वर चाफवली येथे ग्रामपंचायतीच्या मागील संरक्षण भिंत कोसळल्याने ६० हजाराचे नुकसान झाले. लांजा तालुक्यातील साटवली येथे संजय गोठणकर यांच्या घराचे २५ हजाराचे, आंबेड येथील दत्ताराम मडवी यांच्या घराचे ४५ हजाराचे नुकसान झाले. जिल्ह्यात सुमारे दोन लाख रुपयाचे नुकसान एका दिवसात झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. रत्नागिरीचे नुतन प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी सायंकाळी चांदेराई व हरचिरी या दोन ठिकाणांना भेटी दिल्या.