शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार क्षणात कोसळलं. राज्यात आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं आहे.
राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे. शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केले.
आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील शिंदे सरकार फार काळ टिकू शकणार नाही. हे सरकार जास्तीत जास्त पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी, मतदार संघामध्ये जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज संख्या मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही देखील परतण्याची शक्यता आहे.
सरकार पडल तर मध्यवर्ती निवडणुका घ्याव्या लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून सुरु करा असं त्यांनी सांगितले. शिंदे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात जाऊन काम करत राहा. मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर त्याची तयारी असावी. त्यामुळे आमदारांनी मतदार संघात लक्ष द्यावे, असेही शरद पवार म्हणाले.
रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित होत्या. त्यावेळी शरद पवारांनी आमदारांना मार्गदर्शन केले. त्यावेळी पवार बोलत होते.