मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत बैठक घेतली असून त्यामध्ये या संदर्भातील महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदासुद्धा दहीहंडी साजरी होणार नाही की निर्बंधांच्या अटी घालून दहीहंडीला राज्य शासनाकडून परवानगी देण्यात येणार, हे मुख्यमंत्री स्पष्ट करणार होते. मागील वर्षीपासून देशावर घोंघावणारे कोरोनाचे संकट लक्षात घेता याही वर्षी कोरोना निर्बंधांचे पालन कडक शिस्तीने करण्याचे सांगून, यंदाही सार्वजनिक दहीहंडी उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे.
ऑनलाईन बैठकीत राज्यातील गोविंदा पथकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, त्याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यानी राज्यातील जनतेच्या संराक्षणाप्रती केलेल्या कळकळीच्या विनंतीला उपस्थित दहीहंडी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनीही देखील प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्य विषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची भावना व्यक्त केली. त्यांनी शासनाचे प्रथम कर्तव्य हे जनतेचे प्राण वाचवून रक्षण करणे हेच असल्याचे स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे,मुख्यमंत्र्यांनी सर्व गोविंदा पथकांना आवाहन केले आहे कि, कोरोनाचे संकट समूळ नष्ट होईपर्यंत, काही काळासाठी आपले सणवार, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करणे बाजूला ठेऊन जनतेचे प्राण जपण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले आहे, हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम बाळगून आणि धीराने आणि पूर्णत: सारासार विचार करून, आपण मिळून कोरोनाला हद्दपार करूया. मागील दीड वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिकपणे दहीहंडी कार्यक्रमाला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दहीहंडी पथक, बालगोपाळांचा काहीशी नाराजी पसरली आहे.