मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि उद्भवलेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे मुरादपुर पेठमाप भागातील गणपती कारखानदारांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या महापुरात २०० पेक्षा जास्त गणेशमूर्तीचे जाऊन सुमारे २४ लाखांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी गणपती कारखानदार आधीपासूनच सतर्क झाले असून, त्यांनी यावर्षी आपल्या गणेशमूर्ती कार्यशाळा आपल्या वरच्या मजल्यावर हलवल्या आहेत.
गतवर्षीच्या महापुराची भीती अजूनही चिपळूणकरांच्या मनामध्ये ताजी आहे. नदीकाठचे रहिवासी आजही पाऊस वाढल्यावर अनेक रात्र जागून काढत आहेत. गतवर्षीच्या महापूरात चिपळूणकरांचे प्रचंड नुकसान झाले होते. अजूनही त्यांच्या मनात प्रशासानाबद्दल खंत आहे कि, जर मागील वर्षी प्रशासनाने आम्हांला वेळीच सूचना दिल्या असत्या तर, आमच्या कारखान्याचे नुकसान झाले नसते. पहाटेच्या वेळेलाच कारखान्यामध्ये पाणी भरायला सुरुवात झाल्याने त्यावेळी कार्यशाळेतील या गणेशमुर्ती दीर्घकाळ पाण्यात राहिल्यानें पाण्यात सर्व गणेशमुर्ती विरघळल्या, शिल्लक राहिली ती फक्त माती. त्यामुळे यावर्षी मात्र गणेशमूर्ती कारखाने हे बाल्कनी टेरेसवरच हलवण्यात आले आहेत.
२२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुराने चिपळूण शहर उध्वस्त झाले. एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता तर, दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे वाशिष्टी नदीचे पाणी वाढतच जात होते. शहरात वशिष्ठी नदीच्या पुराचे पाणी शिरल्यावर क्षणांतच परिस्थिती बदलली. अनेकांचे संसार वाहून गेले, तर काहींची घरें उध्वस्त झाली. बाजारपेठेत तर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
पूराची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून शासन, प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी, उपाययोजना घेण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या पुराची दहशत अजूनही मनात जिवंत आहे. आता यंदाच्या वर्षीच्या पावसाकडे चिपळूणकरांच्या नजरा लागल्या आहेत. त्रिमूर्ती गणेश कारखान्यात जवळपास सर्वच गणेशमूर्ती मातीपासून बनविण्यात आल्याने, यावर्षी खाली असलेला कारखाना वर घेण्यात आला आहे. अचानक पाणी शिरले तर या मुर्ती हलवण्यात वेळ जातो, त्यासाठी मालकाने आपल्या कारखान्यात एक ट्रॉली स्वतः बनवून त्यातूनच खालून वरती गणेशमूर्तीची ने-आण केली जाते.