कोरोना काळापासून बंद असलेल्या आणि कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर कडक निर्बंधात रेल्वे गाड्या सुरु झाल्या आहेत. त्यासोबतच रेल्वेतील सामान, मोबाईल, दागिने चोरीच्या घटना ज्या कोरोना काळामध्ये थांबल्या होत्यात त्या पुन्हा सुरु झाल्या आहेत. प्रवासा दरम्यान भुरट्या चोरांचे वस्तू चोरण्याचे प्रमाण सुद्धा वाढायला लागले आहे.
थिवीम स्टेशन ते पनवेल रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञाताने लांबवल्याची तक्रार चिपळूण पोलीस स्थानकात काल २० जानेवारी रोजी दाखल करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संजय मधुकर जायपाटील वाय ५६, रा. मुरुड, रायगड हे थिवीम गोवा स्टेशन येथून पनवेल स्टेशन असा रेल्वेने प्रवास करत होते.
प्रवासात त्यांना झोप लागली होती. चिपळूण रेल्वे स्टेशन येथे आले असता त्यांनी आपल्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल तपासला असता,खिशात त्यांना मोबाइल आढळून आला नाही. यानंतर त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून मुलाच्या मोबाईलवर फोन केला आणि त्यांच्या स्वत:च्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले असता, यावेळी मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे मुलाने सांगितले.
त्यानंतर संजय जायपाटील यांनी चिपळूण पोलीस स्थानकात १५ हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा एमआय १०एस कंपनीचा मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाता विरोधात भादवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार शेटकर करत आहेत.
कोरोना कालावधीनंतर रेल्वे, बस वाहतूक सेवा पुन्हा सुरळीत झाल्यानंतर गुन्ह्यांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढायला लागले असल्याची माहिती पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विशेष करून प्रवासा दरम्यान सतर्कता बाळगण्यास रेल्वे प्रशासन, पोलीस विभागाकडून वारंवार सांगितले जात असते.