मराठा आरक्षणासाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे निघाले. या मोर्चानी इतर समाजांना आदर्श घालून दिला होता. आंदोलने कशी असावीत याचे उत्तम उदाहरण मराठा समाजाचे दिले जात होते. लाखोंचे मोर्चे निघाले तरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागला नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे उपोषण सुरु आहे. जालन्यातील अंतरवाली सराठी गावात मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गेले आठ दिवस हे उपोषण शांततमय मार्गाने सुरु असतानाच शुक्रवारी १ सप्टेंबरला पोलिसांनी बळाचा वापर करत उपोषणकर्त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. त्यातून पोलिसांशी आंदोलकांची चकमक उडाली. पोलिसांनी अचानक बेछूट लाठीमार केल्याने साऱ्या राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून गेले ३ दिवस राज्यातील विविध भागात मराठा समाज बांधव या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करत आहेत.
चिपळुणात मोर्चा – सोमवारी चिपळुणात मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. मोर्चा निघाला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर मंगळवारी रत्नागिरीत मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन केले.
तुफान गर्दी – मंगळवारी रत्नागिरीत मराठा बांधवांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर मंगळवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा बांधवांची गर्दी होऊ लागली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सारा परिसर गर्दीने फुलून गेला. यावेळी महिला, भगिनींचीदेखील मोठी उपस्थिती होती.
जोरदार घोषणाबाजी – संतप्त झालेल्या रत्नागिरीतील मराठा बांधवांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. कोण म्हणतंय देणार नाय… घेतल्याशिवाय राहणार नाय. अशा गगनभेदी घोषणांनी मराठा बांधवांनी सारा परिसर दणाणून सोडला. अत्यंत नियोजनबद्ध आंदोलन पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना पहायला मिळाले.
राज्य सरकारकडून न्याय नाही – जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्र जमलेल्या मराठा बांधवांनी राज्य शासनाचा निषेध केला. गेल्या ७ वर्षात २८ मोर्चे मराठा बांधवांनी काढले. कोपर्डीतील घटना आणि आरक्षण हे मुख्य बिंदू या मोर्चाचे होते. परंतु आजवर या दोन्ही विषयांना राज्य सरकारकडून न्याय मिळाला नाही. याबाबत मराठा बांधवांनी खेद व्यक्त केला.
राजकारणाचा बाजार – या आंदोलनावेळी संतप्त मराठा बांधवांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी बोलताना मराठा सम जाचे युवा नेतृत्व कौस्तुभ सावंत यांनी सांगितले की, आज राजकारणाचा बाजार मांडला गेलाय आणि याच बाजारात मराठा समाज भरडला जात आहे, असा आमचा सरळसरळ आरोप महाराष्ट्र शासनावर असल्याचे सावंत यांनी सांगितले.
आमच्या भावना तीव्र – यावेळी मराठा समाजाचे नेते केशवराव इंदुलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, दरवेळी सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाच्या विषयाचे भांडवल करीत स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण या विषयातील भावना अतिशय तीव्र असून ही बाब पुन्हा नजरेत आणून देणे म्हणजे लाजिरवाणे असल्याचे इंदुलकर यांनी सांगितले.
गर्भित इशारा – यावेळी संतप्त मराठा बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी सनदशीर म र्गाने आंदोलने, मोर्चे काढत असताना जालना येथे घडलेली घटना ही मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक करणारी आहे. भविष्यात या भावना अधिक तीव्र होतील. असे घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य शासन राहील, असा इशारा समस्त सकल म राठा समाजाच्यावतीने देण्यात आला. या आंदोलनात क्षत्रीय मराठा मंडळ, मराठा मंडळ, रत्नागिरी या संघटनांसह तालुक्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि आम मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा – जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आंदोलकांची भेट घेतली. यावेळी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित पाठिंब्याचे पत्र त्यांनी मराठा बांधवांकडे सुपूर्द केले.