बहुचर्चित आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक अखेर आज जाहीर झाले. सर्वांना उत्सुकता असलेली भारत-पाक गटसाखळी लढत श्रीलंकेच्या कँडी शहरात २ सप्टेंबर रोजी होणार आहे आहे. सुपर फोरमध्येही या दोन संघांत सामना होण्याची शक्यता असून तो सामना १० सप्टेंबर रोजी कोलंबोत होईल आणि अंतिम फेरी गाठली, तर १७ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत-पाक लढत अपेक्षित असेल. स्पर्धेची सुरुवात मुलतानमध्ये (पाकिस्तान) होऊन सांगता श्रीलंकेत होणार आहे. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर असा स्पर्धेचा कालावधी असेल. हायब्रिड मॉडेलनुसार होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १३ सामने होणार आहेत. पाक आणि श्रीलंका अशा दोन देशांत सामने होणार असले, तरी सामने सुरू होण्याची वेळ दुपारी १ ही निश्चित करण्यात आली आहे. त्यावेळी पाकमध्ये १.३० वाजलेले असतील. भारत आणि श्रीलंका यांची प्रमाणवेळ समान आहे.
सहा संघांची दोन गटात विभागणी असून अ गटात भारत, पाक, नेपाळ; तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. गटातील पहिले दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी ही आशिया करंडक स्पर्धाही ५०-५० षटकांची असणार आहे. हायब्रीड मॉडेलनुसार पाकमध्ये चारच सामने होणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पाकचे हे चारही सामने एकाच शहरात होणार होते; पण पाक मंडळाचे नवे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी मुलतान या आणखी एका शहराची निवड केली आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामने लाहोर येथे होतील.