रत्नागिरी जिल्ह्यात ३६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काल संध्याकाळी सुमारे ६० ते ६२ टक्के मतदान झाले असून आज सोमवारी मतमोजणी होणार आहे. ग्रामीण भागाचा कौल कोणत्या गटांना मिळणार आहे हे आज स्पष्ट होईल. जिल्ह्यात ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. जिल्ह्यात प्रथमच चिपळूण तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत ३६ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. जिल्ह्यात ठाकरे गट आणि महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि शिंदे गट अशी लढत होताना दिसत आहे.
सध्या जिल्हा परिषदेसह आठही पंचायत समित्या आणि तीन पालिकांवर प्रशासकाची राजवट सुरू आहे. लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. काही ग्रामपंचायतींचा कारभारही प्रशासकाकडे आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्याही प्रशासकाकडे जातील. एकूणच बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्था दीर्घकाळ प्रशासकीय राजवटीखाली आहेत. याचा लोकांच्या कामांवर परिणाम होत आहेच; पण अतिरिक्त कामामुळे प्रशासनावरही ताण आहे.
जिल्ह्यात भाजप विरोधात सर्व पक्ष असे चित्र होते; परंतु शिवसेनेच्या फुटीनंतर पुन्हा एकदा राजकीय चित्रही अस्थिर बनले आहे. अजूनही कोण कोणाच्या बाजूने हे चित्र पुढे आलेले नाही. त्यामुळे मतदार नेमके काय करणार, हे आगामी निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची ताकद आजमावण्याची संधी आता एकाच वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी लक्षात येणार आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत अशाच प्रकारचे चिन्ह दिसून येत आहे.