वादळसदृश परिस्थितीमुळे गेले आठ दिवस हर्णै बंदरातील मच्छीमारीला ब्रेक लागला असून, एक हजार नौका बंदरातच उभ्या आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसायच ठप्प झाला असून, सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान मच्छीमारांना सोसावे लागले आहे तसेच काही नौकांनी उटंबर, जयगड, आंजर्ले आणि दाभोळ खाडीचा आधार घेतला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवर मागील आठवडाभर वादळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अधूनमधून वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका मच्छीमारीला बसला आहे. यंदा मासेमारी हंगामाच्या सुरवातीला खराब वातावरणाचा मासेमारीला फटका बसला. ५ ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली.
जेमतेम दोनच आठवडे मासेमारी करता आली. पुन्हा वादळाने तोंड वर काढले. २३ ऑगस्टला सुरू झालेल्या वादळी वातावरणामुळे पुढे ८ दिवस परिस्थिती बिकट होती. गणेशोत्सवावेळी पंधरा दिवस मासेमारी बंद ठेवल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पुढे महिन्याभरातच ऑक्टोबर महिन्यात वादळाने तोंड वर काढले. गेले आठ दिवस पुन्हा वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमार नौका खोल समुद्रात नेण्यास तयार नाहीत. अनेकांनी सुरक्षिततेसाठी खाडीकिनाऱ्याचा आसरा घेतला आहे. हर्णे बंदरातील नौका उटंबर, आंजर्ले, दाभोळ आणि जयगड खाडीत उभ्या आहेत. त्यामुळे सध्या मासळीचा दुष्काळ पाहायला मिळत असून, मच्छीमारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.