मुंबई-पुण्याहून येणारे पर्यटक चिपळूण, संगमेश्वरमार्गे सिंधुदुर्ग आणि गोव्याकडे जात आहेत. मुंबईहून निघालेले पर्यटक रायगडमधील काही ठिकाणी अडचणींचा सामना करत रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतात. खेड, चिपळूण येथे प्रवास सुखकर झाला की, संगमेश्वर तालुक्यातील सोनवी पुलाजवळ वाहने अडकतात. या पुलापासून पुढे जाताना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. रत्नागिरीतून येणाऱ्या पर्यटकांना बावनदी, वांद्रीपासून पुढे अडथळ्यांची शर्यत पार करत पुढे जावे लागते. संगमेश्वरजवळ आल्यानंतर पर्यटक वाहतूक कोंडीत अडकतात. चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम आणि आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतूककोंडी होत असली तरीही प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्याने अरूंद मार्गावर जाण्याच्या दिशेने दोन रांगा तर येण्याच्या दिशेला दोन रांगा लागतात.
त्यात अवजड वाहन असेल तर मात्र अडचण होते. काही ठिकाणी दुसरी मार्गिका बंद असल्यामुळे किंवा डायवर्जनचे फलकच न लावल्याने वाहनचालक बंद असलेल्या मार्गिकेत वाहने चालवत जातात. त्यामुळे पुढे जाऊन वाहतूककोंडी होते. दरम्यान, चिपळूणहून रत्नागिरीकडे छोट्या वाहनातून जाणारे पर्यटक वाहतूककोंडी टाळण्यासाठी डिंगणी मार्गाचा पर्याय निवडत आहेत. तो शास्त्रीपूल येथून सुरू होतो. रत्नागिरीतून चिपळूणकडे येणार छोटे चारचाकी वाहनचालक जे. के. फाईल चौकापासून गणपतीपुळे रोडमार्गे उक्शी आणि डिंगणीमार्गे चिपळूणकडे येत आहेत.
पोलिसांचे प्रयत्नही अपुरे – वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात केले आहेत; मात्र पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहने पुढे दामटली जातात. एका बाजूने वाहने जाण्यासाठी पोलिस मार्ग काढत असताना दुसऱ्या बाजूकडील वाहनचालक थांबणे गरजेचे असते; मात्र जोरजोरात हॉर्न वाजवून ते चालक वाहने पुढे घेतात. तिथे पोलिसांचीही मात्रा चालत नाही.
स्थानिकांनाही फटका – चिपळूणहून रत्नागिरीला आणि रत्नागिरीहून चिपळूणला दिवसाला शेकडो प्रवासी मिळेल त्या वाहनाने येतात. त्यात काही शासकीय नोकरदारही आहेत. वाहतूककोंडीमुळे त्यांना तब्बल दोन ते अडीच तास उशिरा पोहचावे लागत आहे. एसटीसह खासगी प्रवासी वाहतुकीची वाहने वाहतूक कोंडीत अड कल्यानंतर त्यांचे इंधन वाया जाते.