पावसमध्ये मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा नसल्यामुळे तसेच जनावरांच्या मालकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने मोकाट जनावरांचा त्रास वाहनचालकांना व येथील दुकानदारांना सहन करावा लागत आहे. यासाठी पावस ग्रामपंचायतीला ठोस उपाययोजना करावे व होणारे अपघात टळावे, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांमधून होत आहे. पावस परिसरातील अनेक शेतकरी उन्हाळा असो वा पावसाळा असो, आपली जनावरे मोकाट सोडलेली आहेत. ही जनावरे रस्ता, दुकाने आदींचा आश्रय घेतात. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतुकीत अडथळा येत आहे.
या संदर्भात वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. रात्री ही गुरे दुकानांचा आश्रय घेत असल्यामुळे रात्रभर त्या ठिकाणी शेणाचे सारवण घातलेले असते. त्याचा त्रास दुकानदारांना सहन करावा लागतो. वाहनचालक व दुकानदारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी किंवा त्या जनावरांना एकत्रितरीत्या डांबून ठेवावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात संकेत राड्ये म्हणाले, पावस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये चांगल्या तऱ्हेने विकासकामांवरती भर दिला जातो.
पावस पर्यटन क्षेत्र आहे. या ठिकाणी परप्रांतातून अनेक पर्यटन येत असतात; मात्र त्यांना या मोकाट जनावरांचा सामना करावा लागतो. गावामध्ये कोंडवाडा नसल्याने या जनावरांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित मालकांवर कारवाई करण्याची गरज आहे.