गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्यरेल्वेने अतिरिक्त गणपती विशेष २५० फेऱ्यांव्यतिरिक्त आणखी ४४ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच दिवा-चिपळूण-दिवा मेमू अनारक्षित विशेष रेल्वेच्या आणखी २ फेऱ्या कोकण रेल्वेमार्गावर सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात २९६ विशेष ट्रेन गणेशभक्तांच्या सेवेत धावणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेच्या आठ गाड्या चालवण्यात येणार आहेत. ही ट्रेन २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर व ७ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. या गाडीच्या ४ फेऱ्या सोडण्यात येतील.
परतीच्या प्रवासात २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथून रात्री ११.२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणाऱ्या या गाडीचे आरक्षण ३ ऑगस्टपासून होईल. अनारक्षित विशेष गाड्यांमध्ये दिवा-चिपळूण-दिवा मेमू या रोज धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या २ अतिरिक्त फेऱ्या कोरे मार्गावर चालवण्यात येणार आहेत. दिवा-चिपळूण ट्रेनची १ फेरी आणि चिपळूण-दिवा गाडीची १ फेरी वाढवली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या ३८ अनारक्षित विशेष रेल्वेऐवजी आता ४० अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत तसेच २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान दिवा-चिपळूण-दिवा मेमू अनारक्षित विशेष ट्रेन धावेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दिवा-खेड-दिवा मेमूच्या ३६ सेवा – दिवा-खेड-दिवा मेमू या अनारक्षित विशेष रेल्वेच्या ३६ फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष ट्रेन २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दिवा येथून दररोज दुपारी १.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ८ वाजता खेड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही विशेष ट्रेन २३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत खेड येथून दररोज सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजता दिवा येथे पोहोचेल.