रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील बेपत्ता मच्छीमारी नौकेचा शोध अजूनही सुरूच आहे. खासगी कंपनीच्या मालवाहतूक जहाजाने धडक दिल्याने नवेद २ नौका बुडाल्याचा मच्छीमारांचा अंदाज आहे. या प्रकरणी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला गेला नाही तर, समुद्रामध्येच चक्का जाम आंदोलन करू, असा आक्रमक पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहे.
मंत्री उदय सामंत यांनी आजच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये जयगड येथे काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मच्छीमार नौकेच्या संदर्भात जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी पुन्हा एकदा सर्चिंगचे आदेश दिले असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. जयगड येथे बेपत्ता झालेल्या नौकेचे अवशेष व त्यावरील माणसे अद्यापही मिळालेली नाहीत यामुळे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधत होते, या बोटीला अपघात झाला की त्यामध्ये कंपनीचा काही दोष आहे का?
हा अपघात नैसर्गिकदृष्टय़ा घडला होता का!, याची सुद्धा सखोल चौकशी जिल्हाधिकारी करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. मात्र त्यांनी अपघातग्रस्त झालेल्या नौकेचे अवशेष अथवा त्यावरील माणसे सापडले नाहीत हे आश्चर्य व्यक्त केले. सामंत म्हणाले तरीदेखील आपण संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी वेळीच आपला तपास सुरू केला असला तरीही जिल्हा प्रशासनाकडून किंवा खासगी कंपनीकडून देखील कोणतीच ठाम भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक मच्छीमार अधिक आक्रमक होत आहेत. ती मच्छीमारी नौका गायब कशी होऊ शकते! जरी ती अपघातग्रस्त झाली तरी, त्याचे अवशेष मिळणे तरी आवश्यक होते, त्यामुळे नक्की काय प्रकार घडला आहे याबाबत सखोल तपासाची मागणी होत आहे. त्यावर असणाऱ्या सहा मच्छीमार्यांचा अजूनही काही अतापता लागलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर त्या बेपत्ता बोटीचा आणि बोटीवरील मच्छीमार्यांचा शोध घेण्यात यावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.