रत्नागिरी-राजापूर तालुक्यात ठाकरे गटाला यश आले आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर गद्दारांना चारीमुंड्या चीत करून निवडणुका लढल्याने, सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंकडून राजन साळवींचं तोंडभरून कौतुक करण्यात आले आहे.
रत्नागिरी-राजापूर तालुक्यातील राजन साळवी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना जोरदार धक्का दिला आहे. आंगले, सौंदळ, राजवाडीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहेत. दक्षिण रत्नागिरीत १८ जागांवर उद्धव ठाकरे गटाचा दबदबा दिसला. यानंतर सोमवारी राजन साळवी यांना उद्धव ठाकरे यांना फोन करुन मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण दिलेलं. यानुसार राजन साळवींनी उध्दव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उध्दव ठाकरेंनी राजन साळवींच्या कामगिरीचे कौतुक करताना शब्द अपुरे पडत होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज माझ्या बाजूला राजन साळवी उभे आहेत. कोकणात गद्दारी करणार्यांनी त्यांना आमिष दाखवली. पण, ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले , जरासुद्धा हलले नाहीत. तर, गद्दारांना गाडून त्यांच्या छाताडावर उभे राहून ग्रामपंचायती निवडून आणल्यात, असे कौतुक उध्दव ठाकरेंनी राजन साळवींचे केले. यावेळी बुलढाण्याचे देखील कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते.
दरम्यान, राजन साळवी यांची सोमवारी अचानक सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या नंतरही माझी निष्ठा कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशीच आहे. मी मरेपर्यंत शिवसैनिक म्हणूनच आहे. कुठंही जाणार नाही, असं राजन साळवी म्हणाले होते. ठाकरे गट अस्थिर असताना राजन साळवी यांनी कायम शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला आहे.