रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारिकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनामध्ये जमीन मालकांना मिळणारा मोबदला हा अगदीच अल्प असल्याने ग्रामस्थांच्या नाराजीला नाम. सामंतांना समोर जावे लागले. विमानतळ विस्तारीकरणासाठी मिळणारा जमीनीचा मोबदला हा केंद्र सरकारच्या अन्य प्रकल्पापमाणेच देण्यात यावा, अशी मागणी शिरगाव-तिवंडेवासियांनी खास. विनायक राऊत यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांमध्ये असलेले भूसंपादनाबाबत गैरसमज व संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित केली. सदरच्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, प्रांत, तहसिलदार, तटरक्षक दलाचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी आदी संबंधित अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत विमानतळासाठी शिरगाव आणि मिरजोळे परिसरातील ग्रामस्थांच्या जमिनी विकत घेण्यात येणार आहेत. जागा देण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध नाही, मात्र त्यासाठीचा दर रेडिरेकनर प्रमाणे ५ हजार ५२५ रुपये इतका आहे. जो अत्यंत अल्प असल्याने ग्रामस्थांनी विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी प्रत्येक जमीन मालकांना योग्य हमीभाव मिळायला हवा अशी मागणी मंत्री सामंत यांच्याकडे केली. नाम. सामंत यांनी त्यावर सांगितले कि, रत्नागिरीतील विमानतळ विस्तारिकरण प्रक्रियेकारिता भुसंपादन करताना रेडीरेकनरपेक्षा अधिक दर मिळवून देण्यासाठी शासनाकडून विशेष पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिरगावासीयांना दिले आहे.
त्यासाठी आवश्यक शिरगाव-तिवंडेवाडीतील ३३ हेक्टर भूसंपादन क्षेत्राची मोजणीची कार्यवाही पूर्ण झाली असून मिरजोळे येथील ६ हेक्टर क्षेत्राची जमीन मोजणी अद्याप शिल्लक आहे. यावेळी मंत्री सामंत यांनी मोबदला वितरणात कोणताही अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनीही दराबाबत तोडगा काढण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. जमिनीचे दर खासगी प्रमाणे मिळणार नाहीत, पण या प्रकल्पासाठी मोजणी प्रकिया पूर्ण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. हि प्रकिया पूर्ण करून पुढील विस्तारीकरणाचे काम सहा महिन्यामध्ये पूर्ण करा, अशा सूचना मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.