राहुल नार्वेकरांनी जी दमदाटी केली आहे त्यासाठी त्यांना पदावरुन हटवलं पाहिजे. शिवाय जिथे निवडणूक झालेली नाही तिथे निवडणुकीचा अधिकार जो हिरावून घेतला गेला आहे तो त्यांना मिळाला पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसह २९ महापालिका निवडणुकांचं रणमैदान सध्या चर्चेत आहे. १५ जानेवारीला महापालिकांचा रणसंग्राम रंगणार आहे. तर १६ जानेवारीला या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. नेमकं काय घडतं याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस हे लादलेले मुख्यमंत्री आहेत, त्यांची तरी निवह कुठे झाली आहे असा सवाल करत जोरदार टीका केली आहे. राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या अटीतटीच्या सामन्यात सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. सगळ्याच पक्षांनी प्रचाराला जोर धरला आहे. काहींनी वचननामा प्रसिद्ध केला, काहींनी जाहिराती प्रसिद्ध केल्या, तर काहींनी निवडणूक गीतं प्रसिद्ध केल. अशातच आज भाजपच्या निवडणूक गीतातील भगवा शब्दावर निवडणूक आयोगाने बंदी घातली.
यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आदेश देणाऱ्याला जोड्याने मारायला हवं असं म्हणत, निवडणूक आयोगावर निशाणा साधला. निवडणूक आयोगाने भाजपच्या निवडणूक गीतातील भगवा शब्दावर बंदी घातली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा आदेश देणाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे असे ते म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्णयांना चपराक देत त्यांनी म्हटलं की, माझ्या लोकसभा निवडणूक गीतामध्ये हिंदू हा तुझा धर्म हा शब्द काढायला लावला, जय भवानी जय शिवाजी हा शब्द काढायला लावला. मी काढला नाही, मी काढणारही नाही असा ठाम पवित्रा त्यांनी या वेळेस दाखवला. पुढे ते म्हणाले निवडणूक आयोगाने त्यांच्या चौकटीत राहिला पाहिजे. जर ते भगवा शब्दाला नाकारत असतील तर मोदी आणि अमित शहा यांनी लोकसभेच्या वेळेला अयोध्येच्या नावाने जो प्रचार केला तेव्हा, त्यांना का नाही त्यांनी शिक्षा केली? असा सणसणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. शिवाय हे भलते सलते आरोप आम्ही ऐकणार नाही असं देखील ते म्हणाले.

