रत्नागिरीमध्ये अनेक उद्योगधंदे , विविध व्यवसाय केले जातात. कोकण किनारपट्टी असल्याने मत्स्य व्यवसाय हा रत्नागिरीमधील प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे. विविध प्रकारची शेती, फळ झाडांचे उत्पन्न मोसमानुसार घेतले जाते. त्यामुळे कोकणातील जे पारंपारिक व्यवसाय आहेत, त्यामुळे कोकणची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
रत्नागिरीतील मालगुंड येथे समीर साळवी नामक व्यक्तीने कोळंबीचा शेती प्रकल्प उभारला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य संवर्धक विभाग आणि मत्स्य जलशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी राष्ट्रीय मत्स्यसंवर्धक दिनाचे औचित्य साधून मालगुंड येथील ग्लोबल अॅक्वा या कोळंबी शेती प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक मार्गदर्शन केले.
कोळंबी शेती प्रकल्पधारक समीर साळवी व इतर संवर्धक यांना राष्ट्रीय मत्स्यसंवर्धक दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले. कोळंबी संवर्धनाचे सुयोग्य व्यवस्थापन, जैव सुरक्षितता आणि आरोग्य व्यवस्थापन याबाबत डॉ. सुरेश नाईक, डॉ. अनिल पावसे, डॉ. मिलिंद सावंत, डॉ. गजानन घोडे आणि डॉ.राजू तिबिले या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रकाश शिनगरे यांनी मार्गदर्शना बरोबरच प्रकल्पधारकाना अशा प्रकल्पांमध्ये सर्वतोपरी तांत्रिक सहकार्य मत्स्य महाविद्यालयातर्फे केले जाईल, असे आश्वासन दिले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या मत्स्यसंवर्धक दिन कार्यक्रम आयोजन विशेष करून मत्स्य संवर्धन विभाग आणि मत्स्य जलशास्त्र विभाग यांच्या सहाकार्याने व सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रकाश शिनगारे यांच्या प्रेरणेने करण्यात आला. यावेळी प्रकल्पावर इतर मत्स्यसंवर्धक, पुरवठाधारक तसेच कामगार वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.