जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध प्रकारचे अपघातांच्या मालिकाच सत्र सुरुच आहेत. आधी महामार्ग किंवा अंतर्गत रस्त्यांचे दुरुस्तीचे कामकाज सुरु असल्याने अनेक प्रकरचे अपघात घडून येत होते. तर काही वेळेला वाहने बेदरकारपणे चालवल्याने अपघात घडून आले आहेत. हल्ली तर प्रत्येक महामार्गाच्या वळणावर अवजड वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक सारखे मोठे वाहन आडवी झालेली, पलटी झालेली दिसून येतात. यामध्ये मोठ्या प्रमणात वाहनाचे नुकसान होत असून, काही वेळा चालक आणि क्लिनरला आपले प्राण गमवावे लागतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दुपारी वैभववाडी जवळ शुकनदीच्या पुलावरून ७० फुट खोल नदीत कार कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कारमधील पाचही जण बचावले असुन दोघेजण जखमी आहेत.
मुंबईहुन गोव्याकडे निघालेली एक कार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एडगाव येथे आली. वैभववाडीच्या दिशेने येत असताना शुकनदीच्या पुलावरून कार कोसळली. ७० फुट खोल नदीत पात्रात जावुन कार थांबली. या अपघाताची माहीती मिळताच तेथे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. घटनास्थळी पोलिस आणि स्थानिकांनी धाव घेत कारमधील सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
अपघाता दरम्यान कारमध्ये एकुण पाचजण होते. त्यापैकी दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. केवळ दैव बलवत्तर म्हणून या पाच जणांचे प्राण वाचले आहेत. नाहीतर एवढ्या उंचीवरून अचानक कोसळल्यावर कोणीही वाचण्याची शक्यता अंधुकशीच होती. पण हि लोक बालंबाल बचावली. वाहनाची अवस्था भीषण झाली आहे. उंचीवरून पडल्याने ती पूर्ण डेमेज झाली आहे. कारची अवस्था बघून अपघाताची भीषणता लक्षात येते आहे.