27 C
Ratnagiri
Sunday, October 27, 2024
HomeRatnagiriमहायुतीच्या विजयाचे प्रमाण चांगले राहील - मंत्री उदय सामंत

महायुतीच्या विजयाचे प्रमाण चांगले राहील – मंत्री उदय सामंत

जुनी पेन्शन, पदवीधरांचे प्रश्न, शाळांचे प्रश्न यासाठी सातत्याने राज्यसभेत आवाज उठवला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह कोकणात आमचे विजयाचे प्रमाण चांगले आहे. कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे हे लोकसभेला ६ पैकी ५ जागा जिंकून स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभेलाही कोकणात महायुतीच्या विजयाचे प्रमाण ८५ टक्क्याहून अधिक असेल, असा आत्मविश्वास राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदार संघात जे मतदान होईल त्यातील ७५ टक्के मतदान हे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे घेऊन विजयी होतील, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, कोकण पदवीधरसाठी जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली. या बैठकीत भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदार संघात पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सहा जिल्हे येतात. मागील बारा वर्षात निरंजन डावखरे यांनी मतदार संघात चांगले काम केले आहे. जुनी पेन्शन, पदवीधरांचे प्रश्न, शाळांचे प्रश्न यासाठी सातत्याने राज्यसभेत आवाज उठवला आहे.

त्यांनी केलेली कामे संबंधित विभागात दिसून येतात. त्यामुळे जे मतदान होईल त्यातील ७५ टक्के मते डावखरे घेतील आणि कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा सिध्द होईल असे सांगितले. जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय यापूर्वी शासनाने घेतला आहे. त्यामुळे सर्वांनाच माहित आहे की, महायुतीच हा प्रश्न सोडवू शकते. राज्य सभेसाठी होणाऱ्या निवडणुकात सर्वच ठिकाणी महायुती विजयी होईल, असा विश्वासही सामंत त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular