राजकारणातील कुरघोडी पार पडल्या, नवीन सरकार स्थापन झाले तरी, तरी आजी माजी मंत्र्यांची एकमेकांवर टीका टिपण्णी करणे सुरुच आहे. एकाने टीका केली कि, दुसरा प्रत्युत्तर देण्यासाठी सज्जच आहे. मविआ सरकारला आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे नामुष्की पत्करून पायउतार व्हावे लागले, ही प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनात सल आहे.
नारायण राणेंनी नवीन सरकारच्या स्थापने नंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून, मुख्यमंत्री असताना त्याना सरकार वाचवता आले नाही. यांच्या सारखे दुर्देव ते काय? आता शिवसेना कदापी उभी राहण शक्य दिसत नाही, अशी राणेंनी टीका केली होती. त्याला आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे हे मोदी सरकारमधील सर्वात निष्क्रिय केंद्रीय मंत्री आहेत. लवकरच त्यांचं मंत्रिपद जाईल, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणेंच्या दुकानाचं शटर पूर्ण बंद झालेलं आहे, त्याचं त्यांनी अवलोकन करावं. काल परवापर्यंत माझा मुलगा पालकमंत्री होईल, अशा टिमक्या राणे वाजवत होते. मात्र आता दीपक केसरकरांच्या रूपात नितेश राणेंना त्यांची योग्य ती जागा दाखवली जाईल. तसेच भाजपासुद्धा नारायण राणेंचं मंत्रिपद काही महिन्यात काढून घेईल. या देशातील सर्वात निष्क्रिय केंद्रीय मंत्री म्हणून नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नारायण राणेंची नोंद झाली आहे, असं मला कळलं आहे. त्यामुळे राणेंनी शिवसेनेला फुकटच शहाणपण शिकवू नये, त्यांनी स्वत:चं बघावं, दुकान चालू राहत आहे की, बंद होतंय याचा त्यांनी विचार करावा, अशी सडेतोड टीका विनायक राऊत यांनी केली.