मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था आणि गेले दोन वर्षापासून सुरु असलेले धीम्या गतीचे कामकाज पूर्ण होण्यास मुहूर्तच मिळत नाही असे दिसून येत आहे. अनेक वेळा विविध ठिकाणी, पक्षांनी निदर्शने करून सुद्धा काहीच फरक पडला नसून, त्याची परिस्थिती सुधारलेली नसून जैसे थेच आहे.
अशा खड्डेमय महामार्गावरून वाहतूक करायची म्हणजे एकप्रकारे स्वत:चा जीव मुठीत घेऊन जाण्यासारख आहे. एक प्रकारचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास प्रत्येक सामन्य जनतेला सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डय़ांमुळे प्रवास करणे धोकादायक बनलेले आहे, असा आरोप करत न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी अॅड्. ओवेस पेचकर यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे यासंदर्भात सरकारने आपली बाजू मांडली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. सध्या होणारा त्रास थांबावा व हे चौपदरीकरण सुरू व्हावे यासाठी खासदार, पालकमंत्री, आमदार पुढील आठवड्यात आंदोलन करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
खा. राऊत म्हणाले, पेढे-परशुराम ते आरवली, आरवली ते तळेकांटे, तळेकांटे ते वाकेड या रस्त्याचे प्रत्यक्ष चौपदरीकरणाचे काम अद्यापही सुरूच झालेले नाही. काही ठेकेदारांनी काम पूर्ण न करताच ३५० कोटी रुपये घेतले आहेत. ठेकेदार बदलले तरीही महामार्ग चौपदरीकरणाला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने आंदोलन हा एकमेव पर्याय राहिल्याचे खा.राऊत यांनी स्पष्ट केले आहे. जनतेच्या हिताचा प्रश्न विचारात घेऊन कोणीही ठेकेदाराला पाठिशी घालू नये. त्यांच्यावर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी खासदारांनी केली आहे. .