मागील काही दिवस विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्यावरून अनेक तर्कवितर्क चर्चा सुरु आहेत. आगामी काळात विराट कडून कर्णधार पदाची जबाबदारी काढून घेऊन, रोहित शर्माकडे जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगलेली असतानाच, बीसीसीआयने मात्र या संपुर्ण प्रकरणाची दाखल घेत त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वातील आतापर्यंत झालेल्या टी-२० स्पर्धेत भारतीय संघाला एकदाही यश मिळालेले नाही. त्या टी-२०च्या ट्रॉफीवर विजेतेपदाचे नाव कोरता आलेले नाही. आणि त्यामध्ये तिन्हीची कर्णधार पदे विराट कोहलीकडे असल्याने त्याच्या दबावामुळे त्याचा खेळ नीट होत नसल्याने, टी-२० विश्व चषकानंतर कसोटी सोडून इतर २ सामन्यांचे नेतृत्व कोहली सोडणार असल्याची बातमी समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. परंतु, आज बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धुमल यांनी या संपुर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देऊन प्रकाश टाकला आहे.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष असलेल्या अरूण धुमल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत या व्हायरल झालेल्या सगळ्या वृत्ताचे खंडन केले असून या सगळ्या बातम्या निराधार असून असे काहीही घडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे या सर्व बातम्या माध्यमांतूनच पसरवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
बीसीसीआयच्या बैठकीनंतर ही माहिती समोर आल्याच्या बातमीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे कि, बीसीसीआयची अशी कोणतीही बैठक सध्या झालेली नाही. कोहली सध्या ज्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करत आहे, त्यानुसारच तो कायम करत राहील असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या कोहली संघाचा कर्णधार आहे आणि तोच राहील असेही ते म्हणाले. विराटचे कसोटीमध्ये काम चांगले असल्यानेच कसोटी संघाचे नेतृत्व विराटकडे राहील असेही सांगण्यात आले. तसेच संघ निवडीवरून कोणाचीही आणि कोणतीही नाराजगी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.