एकीकडे मध्यवर्ती बसस्थानकाचे काम रखडलेले असताना दुसरीकडे रहाटघर बसस्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. या बसस्थानकाबाहेरील गटारातील पाणी रस्त्यावर धो-धो वाहत असून दुर्गंधीतून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येऊन ठेपली आहे. रत्नागिरीतील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अनेक वर्षे रखडलेले आहे. नव्याने टेंडर प्रक्रिया झाली आहे. मात्र ज्या रहाटघर बसस्थानकातून एस्. टी. चा प्रवास सुरू होतो ते बसस्थानकच आता समस्यांच्या गर्ते त सापडले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यातच बसस्थानकाबाहेरील गटारातून धो- घो सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. याकडे ना एस्. टी. प्रशासनाचे लक्ष, ना नगर परिषदेचे लक्ष.
प्रवाशांना मात्र या दुर्गंधीचा आणि सांडपाण्याचा रोजच सामना करावा लागत आहे. रत्नागिरी नगर परिषद हद्दीत येणारे रहाटघर बसस्थानक व यां बसस्थानकाबाहेर नगर परिषदेचे भलेमोठे गटार सांडपाणी वाहून नेते. गेली दोन महिने या गटाराची दूरावस्था झाली असून गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर धो-धो वाहत आहे. त्यातून वाहनांची ये-जा सुरू असून हे दुर्गंधीयुक्त पाणी प्रवाशांच्या अंगावर वाहनांच्या वर्दळीमुळे उडत असल्याने वादाचे प्रसंग देखील घडू लागले आहेत. नगर परिषदेने या गटाराकडे दुर्लक्ष केले असून त्याचा त्रास एस. टी. प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
ज्या ठिकाणाहून रहाटाघर बसस्थानकात एस्. टी. प्रवेश करते त्याच ठिकाणी गटारातून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात माजली आहे नुतीच स्वच्छता मोहिम प्रशासनाने हाती घेतली. मात्र प्रशासनाचे रहाटाघर बसस्थानकाकडे दुर्लक्ष झाले. कार्यालये स्वच्छ करण्यापेक्षा नगर परिषदेला गटारांची दूरावस्था दाखवून दिली असती तर ही स्वच्छता मोहिम सफल ठरली असती.