शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शहरवासीयांची वाढती पाण्याची गरज व त्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे. ‘सुधारित पाणी योजने’चे काम पूर्णत्वाकडे गेल्यानंतर शहराला १८ ते २० एमएलडी क्षमतेने पाणीपुरवठा होत आहे. नव्या योजनेमुळे वाढलेली पाणीपुरवठ्याची क्षमता विचारात घेता देखभाल व दुरुस्तीसाठी, तसेच पाण्याच्या बचतीसाठी मॉन्सूनच्या आगमनापर्यंत प्रत्येक सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाण्याची गरज देखील वाढत आहे. शहराला केवळ शीळ धरणावर अवलंबून राहावे लागत आहे.
पानवल धरणाची दुरुस्ती लांबणीवर गेल्यामुळे येथून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची सर्व मदार शीळ धरणावर असते. मात्र, या धरणातूनही होणारा पाणीपुरवठा विस्कळीत असतो. अनेकदा सुधारित पाणी योजनेत पानवल ते नाचणे जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत ६०० एमएमची स्वतंत्र जलवाहिनी पानवलमधून नव्याने टाकण्यात आली आहे. त्यासाठी नाचणे येथे ७ लाख लिटरची क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी झाली आहे. तसेच, साळवी स्टॉप येथे १६ एमएलडी पाणी साठवण टाकी, त्याचबरोबर शहराच्या विविध ठिकाणी पाच साठवण टाक्याची उभारणी या नव्या योजनेतून केली आहे.
या योजनेमध्ये एकूण कामाचे सर्वेक्षण, जलवाहिन्यांच्या छोट्या दुरुस्त्या, जॅकवेल जोडणीची कामे, पम्पिंग यंत्रसामग्री, मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, जलशुद्धीकरण अशी कामे केलेली आहेत. भविष्यातील २०४७ पर्यंतच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून हे पाणी नियोजन केले आहे. त्यातून प्रत्येक प्रभागाला पुरेसे पाणी मिळण्यास मदत होणार आहे. पाणी काटकसरीने वापरा जलवाहिन्यांना अनेक भागांत आजही मोठ्या प्रमाणात गळती लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्या दुरुस्तीसाठी पुन्हा खोदाई करून लागलेली गळती काढण्याचे काम अजूनही थांबलेले नाही. त्यामुळे प्रत्येक सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.