अच्छे दिन आले का ? बँक खात्यात १५ लाख आले का…? गॅस सिलिंडर स्वस्त झाला ना…? पेट्रोल-डिझेलचे दर किती…? असे अनेक प्रश्न उपस्थित करत आम.भास्कर जाधवांनी थेट सर्वसामान्य जनतेकडूनच प्रश्नांची उत्तरे मागितली. फक्त थापा मारून भाजपने सर्वांना गंडवले आहे. आता मात्र फसू नका जागे व्हा. तुमची फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा. असे आवाहन देखील आम. जाधवांनी यावेळी केले. चिपळूण मधील होऊ दे चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यभरात होऊ दे चर्चा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारने दिलेली आश्वासने, राबवलेल्या योजना फोल ठरल्याचे सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे.
राज्यभरात या कार्यक्रमाला सर्वसामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील दिसून येत आहे. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली चिपळूणम ध्ये खेड, पिंपळी, शीरगाव तसेच शहरातील कावीळतळी आणि पाग. येथे होऊ दे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सर्व कार्यक्रम ना उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. शीरगाव आणि पाग येथील बैठका अक्षरशः गाजले. उपस्थित जनतेने तर यावेळी प्रचंड दाद दिली. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, माजी जी.प. अध्यक्ष रोहन बने, तालुकाप्रमुख विनोद झगडे, उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, शहरप्रमुख शशिकांत मोदी, महिला आघाडीच्या ऐश्वर्या घोसाळकर, वैशाली शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, तसेच माजी नगरसेवक व ‘पदाधिकारी उपस्थित होते..
थापा मारून गंडवले – आम. जाधवांनी यावेळी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. केंद्र सरकारने प्रत्येकवेळी नवनवीन थापा मारून सर्वांना अक्षरशः गंडवले आहे. खोटी आश्वासने द्यायची, भावनिक मुद्दे उपस्थित करायचे, आणि लोकांना फसवून मते घ्यायची ही त्यांची नीती राहिली आहे. त्यामुळे आता तरी जागे व्हा.यावेळी मात्र गाफील राहू नका. फसू नका,ज्यांनी तुम्हाला फसवले त्यांना धडा शिकवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
उद्धवजीचे काम उत्कृष्ठ – महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी उत्तम काम केले होते. सर्व काही चांगले चाललेले असताना ४० गद्दारांनी उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसला. मुख्यमंत्री पदावरून त्यांना पायउतार केले. त्यांनी फक्त उद्धवजीना नव्हे तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना फसवले आहे. त्या गद्दारांना आता क्षमा नाही. त्या गद्दारीचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा. पुन्हा त्याच जोमाने, त्याच ताकदीने उठा, शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा विराजमान करण्यासाठी आणि केंद्रातील थापाडे सरकारला हद्दपार करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन आम. भास्कर जाधव यांनी यावेळी केले.