एसटी बँकेवर कामगार संघटनेचे वर्चस्व होते. पंचवार्षिक निवडणुकीत आमचा झालेला पराभव आम्ही सकारात्मक पद्धतीने घेत आहोत. सत्ताधाऱ्यांचेही आम्ही अभिनंदन केले व चांगल्या रितीने कारभार सांभाळण्याचे आवाहन केले; परंतु सत्तेत आल्यानंतर पहिल्याच सभेत सभासदांनी २४ निर्णय घेतले आणि पुढच्याच महिन्यात ते त्यांना मागे घ्यावे लागले. त्यामुळे खोटे आरोप न करता आमच्यासमोर यावे. त्यांना आम्ही उत्तरे देऊ, असे आव्हान देत कर्मचाऱ्यांना कर्जवितरण झाले नाही तर दसरा-दिवाळीत संचालकांच्या दारासमोर आंदोलन करू, असा इशारा एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना दिला. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एसटी बँक निवडणुकीत कर्मचाऱ्यांनी ७.५ टक्के व्याजाने कर्जवितरण, विनाजामीन कर्ज अशा भावनिक आवाहनाला बळी पडले. त्यांची चूक नाही; परंतु हे प्रत्यक्षात शक्य नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कर्जवितरणच बंद केले आहे. कमी व्याजदराच्या कर्जाची कर्मचारी वाट पाहत आहे. आम्ही पत्र दिल्यामुळे कर्ज . देता येत नसल्याची ओरड सुरू आहे. आम्ही एसटी कामगारांच्या विरोधी असे काही केले नाही; मात्र एसटी बँकेच्या या कारभारामुळे ४५० कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढू घेतल्या आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पगार उशिरा होत असल्याबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले, सत्ताधारी व कर्मचारी यांच्यात वाद झाले. त्यामुळे हा प्रकार घडला. कर्मचाऱ्यांवर कारवाईचे बडगा उगारल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ. कामगारांचे पगार वेळेवर होण्याकरिता आम्ही न्यायालयातही दाद मागितली आहे.
एसटीचे ३५ टक्के खासगीकरण – राज्य परिवहन महामंडळात कंत्राटी १६ हजार गाड्या पुढील पाच वर्षांत येणार आहेत. चालक खासगी व वर्कशॉपमध्ये खासगी कामगार असतील. एसटी फायद्यात येत असताना अशा खासगीकरणामुळे नुकसान होईल. एसटी उद्योगात सध्या २५ संघटना असून, आमच्या एकमेव संघटनेला मान्यता असून आम्ही याला विरोध दर्शवला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.