वाटदमध्ये शस्त्र बनविणारा कारखाना येणार आहे. पाकिस्तानला हरविण्यासाठी लागणारी शस्त्र वाटदमधे होणार याचा अभिमान असायला हवा. शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल. येथील कोणतेही मंदिर, घराला हात लावणार नाही. सर्वात जास्त जमिनीला भाव मिळणार आहे, रोजगार, कराराच्या पलीकडे जाऊन काम दिला जाईल. शेतकरी माझा केंद्र बिंदू राहिल, अशी घोषणा उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी केली. प्रकल्पांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. शेतकरी, जमीन मालक, व्यापारी यांची वाटद्` एमआयडीसीच्या जन प्रबोधन सभेत पालकमंत्री बोलत होते. खंडाळा एमआयडीसी परिसरात शनिवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवून दिली. या सभेला विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विविध वयोगटांतील महिला हातात छत्र्या, रेनकोट घालून सभास्थळी दाखल झाल्या होत्या.
जय जवान, जय किसान या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सभेमध्ये एमआयडीसी संदर्भातील नागरिकांचे मत, चिंता आणि अपेक्षा मांडण्यात आल्या. यावेळी बागायतदार काका मुळे, बाळ जोग, बाबू पाटील, कोळवणकर, मधुसूदन वैद्य आदी उपस्थित होते. डॉ. सामंत म्हणाले, इथे कोणती सभा झाली म्हणून मी आलेलो नाही. शेतकऱ्यांनी विनंती केली म्हणून आलो आहे. आमदार म्हणून आलो आहे. घरच्या माणसांचे नुकसान होणार नाही, हे बाहेरच्या पेक्षा मला जास्त माहित आहे. काहींचे विघ्न आणायचे प्रयत्न सुरू आहेत. प्रदूषणविरहित कारखान्यांचे समर्थन केले याचा मला अभिमान आहे. इथे बॉम्ब किंवा अन्य काही बनणार नाही. रोजगार नसल्याने ४० टक्के घर बंद आहेत. आपली मुलं आपल्या आईवडीला समोर नोकरी करावीत यासाठी हा प्रकल्प आणतोय, असे ते म्हणाले. प्रकल्पासाठी १००० एकर जमीन का घेतली, कारण ३०० एकर मध्ये प्रकल्प होणार आहे. उर्वरित सुरक्षेसाठी बफर झोन असेल. ही जम ीन एमआयडीसी नाही तर कंपनीच्या पैशाने जमीन घेणार आहे. तुम्हाला विश्वासात घेऊ प्रकल्प करण्यासाठी मी आलो आहे. विरोधकांशीही याबाबत आपण चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले.