६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी, यांचे मूळगाव असलेले मंडणगड आंबडवे येथील स्मारकावर अभिवादन करण्यासाठी येणार होते. परंतु, कोविडचे नवीन नियम आणि हेलीपॅडची व्यवस्था जवळपास कुठेही होण्यासारखी नसल्याने आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवल्याने, अखेर अनेक गैरसोई होत असल्याने राष्ट्रपतींचा हा दौरा रद्द झाला आहे.
त्याचप्रमाणे ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगडवर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येण्याचा नियोजित कार्यक्रम होता. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर थेट रायगडावर होळीच्या माळावर उतरवण्यात येणार होते, परंतु जगभरातील शिवप्रेमींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही. पण रायगडावरील होळीच्या माळावर आम्ही हेलिकॉप्टर उतरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवप्रेमींनी घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्लावर ७ डिसेंबरपर्यंत पर्यटकांना मज्जाव करण्यात आला होता. दिनांक ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वे देखील पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाने म्हटलं आहे. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्येसुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांवर बंदी घालण्यात आली होती. त्याच प्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचडरोड तसेच नातेगाव ते पाचडमार्ग सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
रायगडावरील होळीच्या माळावर याआधी हेलिपॅ़ड होते. या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरत असताना किंवा उड्डाण घेत असताना कचरा व धूळ उडायची. ही धूळ थेट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जाऊन बसायची. यामध्ये महाराजांच्या अवमानाचा प्रश्न निर्माण झाल्याने १९६६ साली शिवप्रेमींनी उपोषण करून हे हॅलिपॅड काढून टाकण्यास सांगितले. आता होळीच्या माळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टर उतरणार असल्याने शिवप्रेमी कमालीचे नाराज आहेत. अखेर राष्ट्रपतींच्या या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे! .