शहराजवळील भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात साचलेल्या गाळाची समस्या अधिकच जटिल होत चालल्याने मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जूनमध्ये झालेल्या जनता दरबारात मच्छिमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना ऑक्टोबर, २०२३ मध्ये गाळ उपसा करण्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. पालकमंत्र्यांच्या या आश्वासन पूर्तीकडे मच्छिमारांचे लक्ष लागून राहिले आहे. भाट्ये खाडीच्या परिसरातील राजिवडा, कर्ला, जुवे, भाट्ये आणि फणसोप येथील मच्छीमाराना समुद्रात जाण्यासाठी मांडवी बंदराचे मुख हा एकमेव मार्ग आहे.
भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरासह संपूर्ण खाडी परिसर गाळाने भरला आहे. त्यामुळे मच्छीमारांना भविष्याची चिंता सतावत आहे. हा गाळ उपसा झाल्यास मच्छीमारांची मोठी समस्या दूर होणार आहे. या गाळ उपशाबाबत मच्छिमारांनी अनेकदा शासनाला लेखी निवेदने दिलेली आहेत. तरीही शासनाने हा प्रश्न गांभिर्याने न घेता त्याकडे कायम दुर्लक्ष केले. त्यामुळे गाळाची समस्या अधिकच जटील बनली आहे. जून महिन्यात झालेल्या रत्नागिरीतील जनता दरबारात मच्छीमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर गाळाची समस्या पुन्हा मांडली होती. रविवारपासून ऑक्टोबर महिना उजाडत असल्याने आता मच्छिमार गाळ उपसा होणार असल्याने हे काम कधी सुरु होणार, याकडे मच्छीमार लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ उपसा झाला नसल्याने मच्छिमारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्र्यांनी ऑक्टोबर महिन्यात गाळ उपशाच्या कामाला सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे असे मच्छिमार संघर्ष समितीचे अध्यक्ष नजीर वाडकर यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून हा गाळाचा प्रश्न मच्छीमारांना सतावत आहे. या प्रश्नाबाबत अनेकदा शासनाला मच्छीमारांनी निवेदने देवूनही त्याकडे गांभिर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे आता मच्छीम रांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे मच्छिमार संघर्ष समितीचे सदस्य इम्रान सोलकर यांनी सांगितले.