विविध राजापूर, ता. २८ कारणांमुळे कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी, व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आले आहेत. आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या आणि मागण्यांकडे आमदार राजन साळवी यांनी मांडलेल्या प्रश्नाची दखल घेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या आणि मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे मुंडे यांनी बैठकीमध्ये आश्वासित केले. उद्योगमंत्री उदय सामंत व महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, आमदार नीतेश राणे, आमदार अनिकेत तटकरे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे आदींसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रतिकूल हवामानासह अन्य विविध कारणांमुळे कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी, व्यवसायिक आर्थिकदृष्ट्या पुरता मेटाकुटीस आला आहे. आंबा-काजू उत्पादनासाठी विविध स्तरावर मोठ्या प्रमाणात केलेल्या खर्चाच्या तुलनेमध्ये उत्पन्न कमी येत असल्याने खर्चासाठी काढलेल्या बँक कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्यांसह नियमित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, सर्व शेतकऱ्यांना शेती कर्ज २ टक्के दराने मिळावे, खते व औषधांवरील जीएसटी माफ करणे व अनुदान मिळणे, आदी प्रमुख मागण्यांकडे आमदार साळवी यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.
याबाबत मुंडे यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले होते. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित रत्नागिरीच्यावतीने उपाध्यक्ष प्रकाश साळवी, किरण तोडणकर, दत्ताराम तांबे, ज्ञानेश्वर पोतकर, प्रसन्न पेठे आदींनी समस्या मांडल्या. त्यावर चर्चा करताना मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासित केले.