रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना विस्तारासाठी अधिक जोमाने काम करावे. महायुतीच्या हितास बाधा पोहचू न देता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाताना घटक पक्षांच्या प्रमुखांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून विचार केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. कोलाड-सुतारवाडी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, अजय बिरवटकर, भाई पोस्टुरे, मंडणगड तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, स. तु. कदम, महेश केकाणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा साधना बोथरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राकेश साळुंखे, जिल्हा बँक संचालक रमेश दळवी आदी उपस्थित होते. या निमित्ताने आयोजित
स्वागत कार्यक्रमात खासदार तटकरे म्हणाले, मूळ पक्षाच्या विचारधारेशी कोणतीही फारकत न घेता दीर्घकाळ विचारमंथन केल्या नंतरच बहुजन समाजाच्या विकासाकरिता व राज्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवा विचार व नव्या अपेक्षासंह पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची भूमिका असून यासाठी पक्षाशी जोडणाऱ्या जुन्या-नव्या सहकाऱ्यांचे सन्मानाने स्वागत आहे. या प्रसंगी प्रकाश शिगवण म्हणाले, स्वगृही परतण्याचा जीवनातील हा दुसरा व शेवटचा पक्षप्रवेश आहे. या पुढील काळात मतदारसंघात खासदार तटकरे यांच्या नेततृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी काम करणार आहे, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन अजय बिरवटकर यांनी केले. या वेळी मंडणगड, दापोली, गुहागर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.