मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला गती आली असून, जानेवारी २०२६ पूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जुने पिअरकॅप तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता नवीन पिअरकॅप उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. चिपळूण दौऱ्यावर आलेले आमदार नीलेश राणे यांनीही याबाबत महामार्ग अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या होत्या. पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. बहादूरशेखनाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू केले; मात्र, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळला होता. त्या वेळी या कामातील काही त्रुटी समोर आल्या होत्या. त्यानंतर तत्काळ पुलाचा आराखडा बदलण्यात आला होता.
सध्या पूल उभारणीत ४० मीटरच्या गाळ्यांचे अंतर कमी करून ते आता २० मीटरवर ठेवले आहे. त्यासाठी तिथे अतिरिक्त पिअर उभारले जात आहेत. एकूण ९५ पिअरकॅपपैकी अर्ध्याहून अधिक पिअरकॅपचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत. आता उर्वरित पिअरकॅपवर गर्डर चढवण्यासाठी दोन क्रेन मागवण्यात आल्या असून, त्या आधारे महिनाभरात ३२ गर्डर चढवण्यात आले. अजूनही उर्वरित कामासाठी किमान नऊ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने जानेवारी २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे. या पुलाची लांबी १,८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर आहे. ४६ पिलर पुलासाठी उभारण्यात आले आहेत.