विजयदुर्ग-कोल्हापूर या राज्यमार्ग क्रमांक ११५ मधील तळेरे-कोल्हापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा क्र.१६६ जी दर्जा दोन वर्षांपूर्वी देण्यात आला. सुरुवातीला या महामार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार होते अशी चर्चा सुरू होती, परंतु कालांतराने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने हा मार्ग २१ फूट रुंदीचा कॉंक्रिट रस्ता करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय या रस्त्याला तीन फूटपाथ असणार आहेत. या रस्ताकामांचे प्राथमिक सर्वेक्षण देखील झाले आहे.
तळेरे-कोल्हापूर या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून दोन वर्षे होत आली असली तरी रस्त्यांची स्थिती मात्र खूपच भयानक आहे. महामार्ग झाल्यानंतर देखील खड्ड्यांनी आपली जागा सोडलेली नाही. या मार्गावरील करूळ घाट रस्त्याची स्थिती बदललेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा नावापुरताच असल्याचा आरोप आता वाहनचालकांतून होत आहे.
तीन टप्प्यात हे काम करण्याचे प्रयोजन आहे. त्याकरिता सुरुवातीला १०८९ कोटीचा प्रस्ताव होता; परंतु त्यात आता पुन्हा बदल करण्यात आलेला आहे. कळे ते कोल्हापूर या सोळा किलोमीटर रस्त्याकरिता यापूर्वी १७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. याशिवाय कोकिसरे रेल्वे फाटक येथे भुयारी मार्गाकरिता ६४ कोटी रुपये मंजूर आहेत. आता तळेरे-गगनबावडा रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी २२५ कोटीचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणने तयार केला आहे.
राज्यमार्गाचे महामार्गात रुपांतर झाल्यानंतर दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे; मात्र असलेल्या डाबंरीकरण रस्त्यांमध्ये सुधारणा किंवा तो दुरुस्त करण्यात महामार्ग प्राधिकरणाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. महामार्ग प्राधिकरणच्या ढिसाळ कारभारामुळे गतवर्षी करूळ घाटरस्ता वाहतुकीस अयोग्य बनला होता. याशिवाय गगनबावडा ते तळेरे रस्त्याची चांगलीच दुरवस्था झालेली होती.
याशिवाय यामार्गावरील कोकिसरे-बांधवाडी, नापणे रेल्वे फाटकानजीक, नाधवडे-सरदारवाडी, करूळ क्रशर परिसर यासह अन्य काही ठिकाणी मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. राज्यमार्ग असताना ज्या ठिकाणी खड्डे पडत होते, त्याच ठिकाणी आता देखील खड्डे पडले आहेत.