कोकण किनारपट्टीवर मासेमारी सुरु करण्यात आली असून, वातावरणातील बदलाचा मच्छीमारी व्यवसायावर भलताच परिणाम झाला आहे. वेगाने वाहणारे वारे आणि त्यातच खवळलेला समुद्र अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छीमार हैराण झाले आहेत. आणि त्यामध्येच काही ठिकाणी अतोनात पाऊस पडल्याने, वलकांड आल्याने जाळ्यांना पीळ बसत आहेत. मच्छीमार खोल समुद्रात मासेमारी करतात पण बिघडलेल्या वातावरणामुळे पाच टक्केच मच्छीमारी सुरु झाली आहे. मासळी मिळण्याचे प्रमाण अल्प झाल्याने मच्छीमार देखील त्रस्त झाले आहेत.
नैसर्गिक संकटापासूनच यंदाच्या मच्छीमारी हंगामाची सुरवात झाली आहे. बंदी उठल्यानंतर देखील पहिल्याच दिवशी जोराचे वारे आणि खवळलेल्या समुद्राचा खलाशांना सामना करावा लागला. साखरतर येथील एक नौका भरकटून वरवडे किनारी लागली आहे. सध्या इंजिन खराब झाल्याने ती अजुनही तेथेच आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरण अजुनही बिघडलेलेच असल्याने, विशाल लाटांचा सामना करत मच्छीमार समुद्रामध्ये नौका घालत आहेत. छोट्या नौका आणि ट्रॉलर्स मिळून दहा टक्केच मच्छीमार सध्या मासेमारीला जात आहेत.
छोट्या नौकांना बांगडा मिळत असून एका डिशला साधारण दर ५ हजार रुपये मिळत आहे. पालू, लहान मोठी आकाराची कोळंबी, बारीक पापलेट जाळ्यात मिळत आहे. सर्व मिळून साधारणपणे चार ते पाच डिश मासे मिळत आहेत. दररोज साधारण ३० ते ३५ हजाराची मासळी सापडत आहे. पण वातावरणाचा एवढा झालेला बदल त्यामुळे हवी तशी मासळी मिळत नसल्याने व्यावसायिक नाराज आहेत. आणि माशांची निर्यात सुद्धा व्यवस्थित सुरु न झाल्याने दरही कमीच आहे.