महामार्गावरील वाशिष्ठी नदीवर उभारण्यात आलेले नवीन पुल सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. पुलाच्या दोन्ही मार्गावर खड्ड्यांचा सडा पडला आहे. काँक्रिटीकरण उखडून लोखंडी सळ्याच बाहेर पडल्या असल्याने अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित यंत्रणा पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अलिकडच्या काही वर्षात करोडो रूपये खर्च करून वाशिष्ठी नदीवरील दोन जुने पुल तोडून नवीन पुल उभारण्यात आले. सुरूवातीपासूनच या पुलांचे काम वादाच्या फेऱ्यात अडकले होते.
कामाचा ठेका घेतलेल्या पहिल्या कंपनीने हे काम रखडविल्याने सहकारी कंपनी ईगलने या दोन्ही कामांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पावसाळा तोंडावर असल्याने आणि पुल वाहतुकीसाठी खुला करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेली घोषणा यामुळे या दोन्ही पुलांची कामे घाईगडबडीत करण्यात आली. यामुळे या पुलांच्या कामाच्या दर्जावरूनही सर्वसामान्यांकडून शंका उपस्थित केली जात होती. त्याचच प्रचिती सध्या येऊ लागली आहे. या पुलावर सातत्याने मोठ-मोठे खड्डे पडत आहेत.
याशिवाय या पुलावरचे काँक्रिटीकरण उखडले असून लोखंड्या सळ्या कायम बाहेर पडत आहेत. यासंदर्भात स्थानिकांकडून ओरड होताच ठेकेदार कंपनीमार्फत या ठिकाणी दगड-माती टाकून त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. या सळ्या छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रत देत आहेत. अनेकांच्या दुचाकी व चारचाकी या सळ्यांमुळे पंक्चर झाल्या.