प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभघेत जिल्ह्यातील १ हजार १९१ ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौरपॅनेलच्या माध्यमातून ४.२१ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीतील सेवापर्वात ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने यांनी केले आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॉट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळवण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची प्रक्रियाही सुलभकरण्यात आली आहे.
याबरोबरच महाविरणकडून १० किलोवॉटपर्यंतच्या अर्जाना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. एक किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना अंदाजे १२० युनिट वीजनिर्मिती होते. वीज ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज सौरऊर्जा प्रकल्पातून तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते, तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळवता येते. छतावरील सौरऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीज ग्राहकांना पहिल्या दोन किलोवॉटसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये आणि तीन किलोवॉट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॉटपर्यंत प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते.
सर्व प्रक्रिया ऑनलाइन व सुलभ – पीएम-सूर्यघर योजनेत सौरऊर्जा संच बसवणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळते. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून या संबंधातील सर्व प्रक्रिया ऑनलाइन व सुलभ करण्यात आली आहे.