रस्त्यांचे डांबरीकरण होत नाही, साकव नाही, जागेचा प्रश्न, पाणीयोजना, दहा वावाच्या आत मासेमारीला बंदी, महामार्गा मधील मोबदला, आरोग्यविषयक मदत, अतिक्रमणे, फेरीवाले, बंधारे, गाळाचा प्रश्न, रखडलेले पूल, अगदी नोकरी लावण्यापासून जिल्हावासीयांचे १२३ प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबारात जागेवर सोडवले. त्याचबरोबर अनुपस्थित अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. मंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजनच्या सभागृहामध्ये जनता दरबार भरवला होता. जिल्ह्यातून यासाठी १२३ तक्रार अर्ज आले होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील राजापुरातील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तक्रार होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तत्काळ जिल्हा नियोजनमधून पैसे देण्यात आले.
फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. त्याबाबत काही अर्ज होते. यावर सामंत यांनी स्थानिक हातावर पोट असलेल्यांना न उठवता परप्रांतीय फेरीवाल्यांना उठवा आणि त्याबाबत एक धोरण निश्वित करा, असे सांगितले. आठवडा बाजारात मी स्वतः फेरी मारणार आहे. बेशिस्त फेरीवाल्यांना आणि वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांना शिस्त लावा, असे सांगितले. राजिवडा येथील बंधारा आणि गाळ काढण्याच्या कामाबाबत अर्ज आला होता. याचा १३७ कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्याला अर्थविभागाने मंजुरी दिली आहे. याबाबत कमिटीपुढे हा विषय ठेवून लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
दरम्यान बीएसएनएलचे अधिकाऱ्यांना सामंत यांनी बोलावून घेतले. तुम्हाला जनता दर्शनसाठी नाही तर जनता दरबारसाठी बोलावले आहे. केंद्र शासनाचे अधिकारी आहेत म्हणून तुम्हाला जास्त मगरूरी आहे. स्थानिक मंत्री, जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांना मान दिलाच पाहिजे. जनतेचे प्रश्न असल्याने राजापूर, देवरूखमधील बीएसएनएलची रेंज कधी येणार, ते सांगा. चार दिवसात हा प्रश्न सोडवतो, असे अधिकारी म्हणाले. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह सर्व खातेप्रमुख आणि तक्रारदार उपस्थित होते.
…त्या शिक्षकाला काढले बाहेर – जनता दरबारमध्ये एका निलंबित शिक्षकाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट काही प्रश्न विचारले. यावरून सामंत यांनी त्यांना रोखले. माझा जनता दरबार आहे. माझ्याशी बोला, इथे तुमचे प्रशासकीय काम होत नाही. शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करून संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनाची दखल घेण्यास सांगितले. त्यानंतर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी हस्तक्षेप करत त्या शिक्षकासह जनता दरबारातून बाहेर काढले.