नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटक कुटुंबासहित दाखल झाले आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरच्या दिवशी समुद्रकिनारी महिलांच्या सुरक्षेला विशेष महत्त्व देणार असल्याचं डॉ. कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. तसेच जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरे, गडकिल्ले या वास्तूंचे व जागांचे पावित्र्य भंग होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवं वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यात यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त सण साजरे करण्यात आले असल्याने, कोकणात थर्टी फर्स्टलाही यावर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे.
दरम्यान थर्टी फर्स्ट दिवशी जिल्ह्यात कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी पोलिस अलर्ट मोडवर आहेत. विशेषतः समुद्र किनाऱ्यांसह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरु असणार आहे. तसेच गुप्त पध्दतीने देखील पोलिस यंत्रणा कार्यरत राहणार आहे. त्यांच्याकडे छुपे कॅमेरे देखील असणार आहेत. महिला सुरक्षेला प्राधान्य राहणार असून, हुल्लडबाजांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
सणासुदीच्या दिवसामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच ऐरणीवर येताना दिसतो आहे. नवीन वर्षाच्या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये याची काळजी सर्व जनतेने घ्यायची आहे. तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यप्राशन करताना आढळल्यास, तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. पोलिसांच्या या मोहिमेला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.